कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आव्हान असताना ममता बॅनर्जी यांच्यासमोर आणखी एक नवं आव्हान उभे ठाकले आहे. निवडणूक जवळ येत असतानाच पक्षाला गळती लागली आहे. मागील दोन दिवसांत तीन नेत्यांनी तृणमूल सोडल्याने ममतांची डोकेदुखी वाढली आहे.
मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ जितेंद्र तिवारी यांनीही तृणमूलला रामराम केला. दोन नेत्यांच्या राजीनाम्याने पश्चिम बंगाल राजकारणात खळबळ उडालेली असतानाच तृणमूलच्या आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे.
आमदार शीलभद्र दत्त यांनी तृणमूल कॉंग्रेसचा राजीनामा दिला. शीलभद्र दत्त यांच्याबरोबर तृणमूलचे नेते कबिरूल इस्लाम यांनी पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेही लवकरच तृणमूल सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.