Ajit Pawar | ‘बारामती लोकसभा मतदारसंघात माझा परिवार सोडला तर कदाचित माझ्यासोबत कुटुंबातील कोणीही नसेल माझ्या उमेदवाराच्या विरोधात ते प्रचार करताना दिसतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे’.
असे सांगत असताना अजित पवार भावुक झाले. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. बारामतीकर माझ्या पाठीशी असल्याने आतापर्यंत प्रवास करू शकलो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत साथ देण्याच्या आवाहन त्यांनी केले.
शहरातील पाटस रोड येथे वृंदावन लॉन्स येथे बूथ कार्यकर्ता कमिटी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते. प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष जय पाटील, अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, छत्रपती कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे,
बारामती चेअरमन चेअरमन पोपटराव गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन , पुरुषोत्तम जगताप, माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप, शहर युवक अध्यक्ष अविनाश बांधल, आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले पक्ष चोरल्याचा आरोप केला जात आहे. मात्र मी कालही राष्ट्रवादीत आजही राष्ट्रवादीत आणि उद्याही राष्ट्रवादीतच आहे. चौकशी लागली म्हणूनच तिकडे गेले असे आरोप देखील केले जात आहेत. त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. अजूनही काही लोकांना असं वाटतंय की हे एकच आहेत आपल्याला बनवतात पण तशी परिस्थिती आता राहिलेली नाही.
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हाच उमेदवार आहे असे समजून मी दिलेल्या उमेदवाराला निवडून द्या. खासदारकीला डाग लागला तर राज्यात आणि देशात माझी किंमत कमी होईल. ज्या विचारांचे केंद्रात सरकार आहे त्याच विचारांचा खासदार बारामतीतून निवडून गेला तर मोठे प्रमाणावर विकास होईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
सेल्फी काढत फिरून आणि केवळ पार्लमेंट मध्ये भाषण देऊन प्रश्न सुटत नाहीत त्याला मतदारसंघातून काम करावे लागते असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. वरिष्ठांना वेळोवेळी सावध केले मात्र त्यांनी ऐकले नाही त्यांच्या हट्टीपणामुळे ही वेळ आली असल्याचे अजित पवार यांनी पुन्हा स्पष्ट केले.
मतदारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. वेळप्रसंगी मी टोकाची भूमिका घेईल. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले. मतदारांना पातळी सोडून बोलू नका सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा असे आवाहनही पवारांनी यावेळी केले.