ढाका – भारताच्या अंतर्गत भागात सध्यानिर्माण झालेली अशांततेची स्थिती लक्षात घेऊन दक्षतेचा भाग म्हणून बांगलादेशाने भारताच्या सीमावर्ती भागातील मोबाईल नेटवर्क निलंबीत केले आहे. त्या भागात राहणाऱ्या दहा लाख लोकांकडे मोबाईल्स आहेत. त्यांना याचा फटका बसणार आहे.
ग्रामीणफोन, टेलिटॉक, रोबी, आणि बांगलालिंक या मोबाईल कंपन्यांची त्या भागात मोबाईल सेवा उपलब्ध आहे ती आता या आदेशामुळे काही काळ बंद राहणार आहे. भारतात सध्या सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या अनुषंगाने आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्या भागातही अशांत वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा आढावा काल एका उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी हा निर्णय झाला.
भारत, बांगलादेश मान्यमार सीमावर्ती भागात बांगलादेशातील एकूण 32 जिल्ह्यांचा भाग येतो. तेथील मोबाईल नेटवर्क पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. तथापी सरकारने असा काही निर्णय घेतल्याची आम्हाला कल्पना नाही असे बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनीच म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्या देशाचे गृहमंत्री खान कमाल आणि विदेश मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी आम्हाला सरकारने हा निर्णय घेतल्याची कल्पना नाही असे म्हटले आहे. दरम्यान मोबाईल कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी मात्र आम्हाला सरकारने हे आदेश दिल्याने आम्ही त्याची अंमलबजावणीही केली आहे असे म्हटले आहे.