औंध – बाणेर स्मशानभूमी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पेव्हिंग ब्लॉक बसवून हा रस्ता बनवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून वाढल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली
दिसून येत आहे. रस्ता समतल न राहता त्या ठिकाणी चढ-उतार निर्माण झाले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून बाणेरचा स्मशानभूमी रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. पावसाळ्यात या रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप येते. स्मार्ट सिटी समजल्या जाणाऱ्या बाणेर मध्ये अनेक मोठमोठ्या रस्त्यांची कामे होत आहेत परंतु स्मशानभूमी रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा हा रस्ता खराब होतो परंतु पथ विभागामार्फत तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता करण्यात येतो. परंतु काहीच दिवसांत पुन्हा दुर्दशा झालेली दिसून येते. बाणेर मुख्य रस्त्यावरून पिंपरी चिंचवड, बालेवाडी, औंधकडे जाणारे वाहनचालक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असलेली दिसून येते. सकाळी ऑफिस भरण्याच्या वेळात व संध्याकाळच्या वेळात या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता प्रशासन हा रस्ता कधी सुरू करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
बाणेर स्मशानभूमी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल आम्ही फाउंडेशनच्या वतीने पुणे मनपा पथविभागाकडे निवेदनाद्वारे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा. तसेच तात्पुरत्या स्वरूपात काम न करता कायमस्वरूपी भक्कम काम या स्मशानभूमी रस्त्याला करण्यात यावे.
– जयेश मुरकुटे, निवेदनकर्ते