पुणे – शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला अखेर हक्काचे पाणी मिळणार आहे. रंगमंदिरासाठी स्वतंत्र नळजोड असला, तरी त्यावर मेट्रो तसेच पोलीस चौकीस नळजोड देण्यात आला आहे. येथील जलवाहिनी वेडीवाकडी असल्याने टाकीत पुरेसे पाणी येत नव्हते. त्यामुळे दरारोज 3 ते 4 पाण्याचे टॅंकर मागविण्याची वेळ प्रशासनावर आली होती. हा प्रकार दैनिक “प्रभात’ने “बालगंधर्व रंगमंदिरात निर्जळी’ या वृत्ताद्वारे समोर आणला होता. त्याची दखल घेत भवन विभाग, सांस्कृतिक विभाग आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी पाण्याच्या नियोजनासाठी पाहणी केली आहे. त्यानुसार पाण्यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक विभागप्रमुख उपायुक्त चेतना केरूरे यांनी दिली.
नाट्यगृहाला दैनंदिन स्वच्छता, एसी तसेच इतर कामांसाठी पाणी आवश्यक असते. सभागृहाच्या मागील बाजूस 80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवलेली आहे. आता त्यात दरारोज सुमारे 6 टॅंकर पाणी बसते. गेल्या वर्षभरापासून या टाकीत पाणीच येत नसल्याने स्वच्छता तसेच इतर कामांवर परिणाम झाला आहे. पाणी कमी पडल्यास वेळेवर टॅंकरही उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा नाट्यरसिक तसेच नाट्यसंस्थांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेकदा शनिवारी, रविवारी येथे गर्दी अधिक असल्यास पाणी कमी पडते. नाट्यगृहाच्या खालील बाजूस जिवंत झरा असला, तरी पाण्यामुळे इमारतीला नुकसान होत असल्याने तो बंद करून पाणी इतरत्र वळवले आहे. मात्र, आता नाट्यगृहालाच पाणी मिळत नाही.
जिवंत झरा मदतीला..
बालगंधर्व रंगमंदिरात नाट्यगृहाचा ए.सी. आणि स्वच्छतागृहासाठी सर्वाधिक पाण्याची गरज भासते. पुरेसे पाणी नसल्यास ए.सी.वर परिणाम होतो आणि ऐन कार्यक्रमावेळी ते बंद पडतात. स्वच्छतागृहांनाही पाणी मिळत नाही. या दोन्ही बाबींसाठी पिण्याचे पाणी वाया जाते. आता स्वच्छतागृह तसेच ए.सी.साठी रंगमंदिराच्या जिवंत झऱ्याचे पाणी वापरले जाणार आहे.