पुणे – बालभारती-पौडफाटा रस्ता आणि नदीकाठ विकसन प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची भूमिका घेत पर्यावरण अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींनी या दोन्ही प्रकल्पांना विरोध केला आहे. काही राजकीय पक्षही हीच भूमिका घेऊ लागल्याने शहरासाठी महत्वाचे असणारे प्रकल्प रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पांबाबत घेतलेल्या ठोस भूमिकेने बालभारती-पौड फाटा रस्ता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बालेवाडी येथे झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजनावेळी फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे. “शहरातील प्रकल्पांबाबत पर्यावरणप्रेमींची काही मते आहेत. त्यांच म्हणणं आम्ही निश्चित ऐकून घेणार आहोत. शहराचे जीवनमान सुधारायचे असल्यास, तर काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. मात्र, काही लोक हे केवळ विकास थांबला पाहिजे या मताचे असतात. त्यांच्याकडे कुठलंही लॉजिक नसतं, तज्ज्ञही नसतात. पण, आमचंच म्हणणं खरं आहे, असा विचार करणाऱ्यांचे आपल्याला ऐकता येणार नाही. पुणेकरांचं जीवनमान सुधारायचं असेल, तर महत्त्वाचे निर्णय घ्यावेच लागतील. जगामध्ये शाश्वत विकासासाठी ज्या उत्तम कार्यपद्धती आहेत, ते आपण स्वीकारल्या पाहिजेत. त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही. विकासामध्ये विनाश होऊ नये, हे खरे असले तरी काहीजण अर्धवट माहितीवर प्रकल्पाला विरोध करतात. त्यामुळे प्रकल्प थांबतो. जगाच्या पाठीवर जे प्रकल्प शाश्वत ठरलेले आहेत मग ते आपल्याकडे का होऊ नयेत?’ असा प्रश्नदेखील फडणवीस यांनी केला.
लवकरच बैठकीची शक्यता
फडणवीस यांच्या भूमिकेमुळे या प्रकल्पांबाबत लवकरच बैठक होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली. लोकसभा, विधानसभा तसेच पालिका निवडणुकांची भीती काही जण राजकीय पक्षांना दाखवत या प्रकल्पाला विरोध करत असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात पर्यावरणास हानी न पोहचवता हा रस्ता करण्याची पालिकेची भूमिका असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणीस यांनी उल्लेख केल्याप्रमाणेच आतापर्यंत काम केले जात आहे,’ असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.