मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.त्यासोबतच पुण्यातील कसब्यासह चिंचवड पोट विधानसभेच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे.राजकीय आरोप प्रत्यारोपांसह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. अशात एका मराठमोळ्या अभिनेत्याने बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाची आठवण करून देत ट्विट केले आहे.
राज्यातील सत्तासंघर्षांवर होणारी चर्चा चौका चौकात ऐकायला मिळते.पहाटेच्या शपथविधीवरून नवीन नवीन विधाने राजकीय नेत्यांकडून केली जात आहेत. ठाकरे गटाने पक्ष संघटनेकडे लक्ष देत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात यात्रा सुरु केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे दिवसेंदिवस राज्यातील राजकारण तापत असताना अभिनेता संदीप पाठकने एक ट्विट करत बाळासाहेबांच्या इच्छेची आठवण सर्व पक्षीयांना करून दिली आहे.
संदीप पाठक आपल्या ट्विटमध्ये म्हणतो,”मा. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल.पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल? जरा कठीण वाटतंय” विशेष म्हणजे या ट्विटमध्ये संदीपने भाजप,राष्ट्रवादी,मनसे,शिवसेना,आप आणि काँग्रेस अशा राज्यातील सर्व महत्वाच्या पक्षांना टॅग केले आहे.
मा. बाळासाहेब ठाकरें ची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल.
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय… @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @INCIndia @AAPMumbai— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) February 24, 2023
संदीप पाठकने केलेले हे राजकीय ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत आपली मते देखील मांडली आहेत.कमेंटमध्ये अनेकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांची नावे टाकली असल्याचे पाहायला मिळते.