नवी दिल्ली – रायगड येथील आर्किटेक्ट अन्वय नाईक आणि त्याच्या आईच्या वर्ष 2018 मधील आत्महत्येसंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्याला आणि इतर दोन जणांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या याचिकेवर सुनावणी घेत टीव्ही अँकरच्या अटकेबद्दल महाराष्ट्र सरकारचे कान ओढले आहेत.
गोस्वामी यांच्या अटक आणि खटला पुन्हा सुरू करण्याच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोन दिवसांनी सुनावणी झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. न्या. चंद्रचूड म्हणाले की, मी गोस्वामी यांचा चॅनल पहात नाही. मात्र, प्रत्येकाला त्याचे म्हणून काही म्हणणे असते की नाही? उच्च न्यायालयांनीही आपले निर्णय देताना घटनात्मक तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांवरही ताशेरे ओढले.