Bacchu Kadu : राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भात सुरु असणाऱ्या आंदोलनाविषयी बोलताना सत्ताधारी मित्रपक्ष असणाऱ्या प्रहार या संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. याविषयी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू यांनी, “शरद पवारांनी एका पत्रात ५२ जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. त्यामुळे खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत,” असे वक्तव्य केले आहे. बच्चू कडूंनी मनोज जरांगे-पाटील यांची रूग्णालयात भेट घेतली. तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या मुदतीबद्दल सरकारचं शिष्टमंडळ जरांगे-पाटलांची भेट कधी घेणार? याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटलांची भेट घेऊन चर्चा करायला हवी होती. जरांगे-पाटलांनी आंदोलन मागे घेतलं नसते, तर सरकारला परिणाम भोगावे लागते असते. सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे.” असे म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
शिष्टमंडळ न येण्यामागे ओबीसी नेत्यांचा दबाव दिसतो का? असे विचारल्यावर बच्चू कडूंनी “दबावाचे कारण नाही. थोडीच अमेरिकेतून आणलेल्या लोकांना ओबीसीमधून आरक्षण देतोय. मराठा समाज हा देशातीलच आहे. मराठा समाजाला गृहित धरूनच ओबीसी आरक्षण देण्यात आलं होतं. काहीजण पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाचं काही देणं-घेणं नाही.” असे म्हटले.
त्यासोबतच “शरद पवारांनी एका पत्रामध्ये ५२ जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत. पण, ५२ जातींमध्ये मराठा समाजाचाही उल्लेख केला असता, तर प्रश्न मिटला असता,” असेही बच्चू कडू त्यांनी म्हटले.