Bacchu Kadu – महायुतीतील घटकपक्ष असलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाजपला (Bjp) टारगेट केले आहे. भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो. नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो.
हे अजिबात चांगलं नाही, यामुळे पक्षाची प्रतीमा मलिन होते, याचे भान देखील ठेवणे गरजेचे आहे, असा टोला बच्चू कडू यांनी भाजपला लगावला. ते हिंगोलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कडू पुढे म्हणाले, भाजपाकडून जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचे काम केले जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी (chandrashekhar bawankule) अचलपूर मतदारसंघात अनिल बोंडे यांना लक्ष घालण्यास सांगितले. पण, बोलून कुणी लक्ष घालत नाही.
एकीकडे सांगायचे सरकारमध्ये सामील व्हा. सामील झाल्यानंतर अशा प्रकारची भूमिका घ्यायची. हे कुणासाठीही चांगले नाही. ज्यांच्याबरोबर आहोत, त्यांच्याशी प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होईल.
दरम्यान, बच्चू कडू यांनी “भाजपाकडून त्रास आहे’ असं विधान केले होते. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बच्चू कडू आमचे मित्र आहेत. कडू हे महायुतीचे घटक असून,
त्यांना कुठलाही त्रास नाही. बच्चू कडू स्वत: निवडून येण्यास सक्षम आहेत. पण, अधिक चांगल्या मताने निवडून येण्यासाठी आम्हीही त्यांच्याबरोबर आहोत.