पुणे : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, अपेक्षेनुसार चांगले शिक्षक मिळत नसल्याने शिक्षणाचा दर्जावर खालावत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता देशातील आयआयटी संस्थांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच एका कार्यक्रमात आयआयटीत बी.एड. अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (आयटीइपी) अंतर्गत प्रायोगिक तत्वावर बी.एड. अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यामुळे बी.एड. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आयआयटीत शिक्षणाची संधी मिळणार आहे. अनेक बी.एड. महाविद्यालयांचा दर्जा समाधानकारक नाही. त्याचप्रमाणे अपेक्षेनुसार शिक्षक मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. चांगले शिक्षक मिळाले नाहीत, तर चांगल्या शिक्षणाची अपेक्षा करू शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना चांगले प्रशिक्षण देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे.
समस्या मात्र जैसे थे
बी.ए. अथवा बी.एसस्सी. बी.एड. असा चार वर्षांचा अभ्यासक्रम यापूर्वीच सर्व विद्यापीठात सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रचलित पद्धतीने पदवीनंतर दोन वर्षाचा बीएड अभ्यासक्रम सुरू आहे. मात्र सध्या नोकरीची कुठलीच शाश्वती नसल्याने दरवर्षी हजारोच्या संख्येने बी.एड.च्या जागा रिक्त राहतात. दिवसेंदिवस विद्यार्थी अभावी बी.एड. महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत आता आयआयटीत बी.एड. सुरू झाल्यानंतर त्यास कसा प्रतिसाद मिळतो, हेच आता पाहावे लागणार आहे.