सोरतापवाडी- उरूळी कांचन (ता. हवेली) येथे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून ते यशस्वीरित्या राबविले जात आहे. त्यातच सरकारने जनधन खात्यात पैसे टाकल्याने ते काढण्यासाठी बॅंकांच्या एटीएम पुढे पैसे काढणाऱ्यांची मोठ्या रांगा लागत आहेत, त्यामुळे बॅंकेमार्फत एटीएमची गाडी उरूळीकांचन गावात फिरवण्यात यावी अशी मागणी विविध बॅंकेच्या शाखा अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीने केली आहे.
त्याला एचडीएफसी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक केतन नारायण यांनी तात्काळ होकार देत शुक्रवार (दि. 17) पासून गावात प्रत्येक ठिकाणी 10 ते 15 मिनिटे ही गाडी थांबणार असल्याचे सांगितले. तसेच बॅंकेच्या पुढे मांडव टाकून तेथे सोशल डिस्टन ठेवून प्रत्येक खातेदारांस इन्फ्रॅनेड थर्मामीटरने तपासणी करूनच बॅंकेत सोडले जाणार असून खातेदारांची पुरेपूर काळजी घेणार असल्याचे बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बॅंकेकडून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याने सरपंच राजश्री वनारसे व उपसरपंच जितेंद्र बडेकर यांनी एचडीएफसी बॅंकेचे आभार मानले आहेत.