सलालाह (ओमान) :- ओमानमध्ये सुरु असलेल्या पुरुषांच्या विश्वकरंडक हॉकी 5 एस पात्रता स्पर्धेत भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात भारताने मलेशियाचा 7-5 असा पराभव केला तर त्यानंतर लगेचच झालेल्या जपानविरुद्धच्या लढतीत तब्बल 35 गोल केले. त्यात स्ट्रायकर व कर्णधार मनिंदर सिंगने तब्बल 10 गोल फटकावले.
भारतीय संघाने जपानचा 35-1 असा पराभव करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जपानविरूद्धच्या सामन्यात मनिंदर सिंगने 10 गोल करत विक्रम साकार केला. मनिंदरला सुरेख साथ देताना महंमद राहिल याने सात, पवन राजभर याने पाच तर गुरजित सिंगने पाच गोल केले.
सुखविंदर सिंगने चार, मनदीप मोर याने तीन तर, जुगराज सिंगने एक गोल केला. जपानकडून एकमेव गोल साताका कोबोरीने नोंदवला. या सामन्यापूर्वी भारताने मलेशियाला 7-5 असे पराभूत केले होते.
या सामन्यात भारताच्या गुरजितने 5 तर मनिंदर आणि राहिलने प्रत्येकी 1 गोल केला होता. मलेशियाकडून आरिफ इशाकने, इस्माईल अबू, महंमद दीन, कमरूलजमा कमरूद्दीन व सियारमन मॅटने प्रत्येकी 1 गोल केला होता.