सोलापूर – लग्नाला मुलगी मिळत नसल्याने तरूणांनी नवरदेवाचा साज चढवून फेटा बांधून, घोड्यावर बसून वाजंत्रींसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोखा मोर्चा काढला आहे. हा तरूणांचा मोर्चा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता लग्नासाठीच्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तरूणांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. त्यातच मुलींच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या अपेक्षा मोठ्या असल्याने काही आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांची तर लग्नाची वये उलटून गेली तरी त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गर्भातच मुलींना मारून टाकल्याने ही परिस्थिती ओढावली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या काळात हे प्रमाण कमी झालेले असले तरी तेव्हाच्या चुका आता या तरूण मंडळींना भोगाव्या लागत आहेत. लग्नासाठी मुलगी मिळत नाही या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात लग्नाळू तरूणांनी नवरी मिळण्यासाठी नवरदेव बनून जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोखा मोर्चा काढला. यावेळी तरूणांनी हातात फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. बेटी बचाव, बेटी पढावचे फलक तरूणांनी हातात घेतले होते.
मोहोळ येथील ज्योती क्रांती सामाजिक संघटनेचे प्रमुख रमेश बारसकर यांच्या पुढाकारातून लग्नाळू तरूणांनी हा मोर्चा काढला. यावेळी तरूणांनी नवरदेवाचा पोशाख परिधान केला होता, डोक्याला मुंडावळ्या, फेटा बांधला, हतात कट्यार आणि घोड्यावर विराजमान होऊन वरातीला साजेल असा मोर्चा काढला. या मोर्चात 25 पेक्षा जास्त घोड्यांवर लग्नाळू तरूण बसले होते. त्याहून अधिक लग्नाळू तरूण नवरदेव होऊन पायी चालत होते. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.