मुंबई – शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाच्या नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनीषा कायंदे यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याआधी रविवारी मनीषा कायंदे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केली होती.
मनीषा कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी प्रा.मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनिषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली, असे शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
यावेळी मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल, त्यांची पत्नी सान्वी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार @KayandeDr यांनी #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी प्रा.मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला… pic.twitter.com/76T5isLlmO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 18, 2023
काय म्हणाल्या मनीषा कायंदे ?
पक्षप्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात होत असलेला बदल आणि त्यांच्या कामाची गतीमानता पाहून आपण शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केला. केवळ दोषारोप करणे आणि आत्मपरीक्षण न करणे की, लोक पक्ष सोडून का जात आहेत. यापुढेही अनेक जण इकडे येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे,” असे मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.