नवी दिल्ली :- चीनने अलीकडेच त्याच्या मानक नकाशाची नवीन आवृत्ती जारी केली. यामध्ये त्यांनी भारताचे राज्य अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण चीन समुद्र आपल्या हद्दीत दाखवला आहे. या नकाशावरून वाद निर्माण झाला होता. कॉंग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले की, चीनचे दावे मूर्खपणाचे आणि निराधार आहेत आणि हे चीन-भारत सीमा विवादाच्या इतिहासाने सिद्ध केले आहे.
मनीष तिवारी म्हणाले की, आज भारत आणि चीनमधील खरा मुद्दा असा आहे की चीनने अनेक ठिकाणी प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघन केले आहे. सीमेजवळील दोन हजार चौरस किलोमीटरचा भारतीय भूभाग बेकायदेशीरपणे बळकावणाऱ्या राष्ट्राच्या प्रमुखांचे म्हणजेच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे दिल्लीत स्वागत करणे भारताच्या स्वाभिमानाला धरून आहे का, याबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने आत्मपरीक्षण करावे, असे ते म्हणाले.
तिवारी म्हणाले की, आधी चीनने बळाचा वापर करुन व्यापलेली जागा रिकामी करण्याची गरज आहे. चीनचे नकाशे मूर्खपणाचे आहेत. हे भारत-चीन सीमा विवादाच्या इतिहासाशी जुळत नाहीत, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून त्यावर चीन आपला दावा सांगू शकत नाही.
चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने एक्सवर ट्विट केले की, चीनने सोमवारी 2023 चा नवीन नकाशा जारी केला आहे. हा नकाशा चीन आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा रेखाटण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. ग्लोबल टाइम्सने जारी केलेल्या नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा प्रदेशही दाखवला आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग मानतो. मात्र, भारताने चीनचा हा नकाशा नाकारला आहे.
त्याचबरोबर चीन तैवानलाही आपल्या भूभागाचा भाग मानतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी चीन व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि दक्षिण चीन समुद्रावरही दावा करतो.