नवी दिल्ली – टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 19 पदके जिंकलेल्या विजेत्या भारतीय खेळाडूंचे सोमवारी मायदेशात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे पदाधिकारी व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते.
तसेच शेकडो क्रीडाप्रेमींनी पहाटेपासूनच येथील विमानतळावर उपस्थिती राखली होती. जेव्हा खेळाडू बाहेर आले तेव्हा त्यांच्या नावाचा जयजयकार करत खेळाडूंचे प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागताने खेळाडू भारावून गेले होते व त्यांना आपले आनंदाश्रूही लपवणे कठीण झाले होते.
खेळाडूंजवळ चाहत्यांनी जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली गेली होती. देशातील करोनाचा धोका अद्याप संपलेला नसल्यामुळे करोनाचे सर्व नियम पाळूनच खेळाडूंना त्यांच्या बसमध्ये बसवून विमानतळावरून रवाना करण्यात आले.
आता हे सर्व खेळाडू राजधानीत होणाऱ्या सतक्रा सोहळ्याला उपस्थित राहणार असून त्यानंतर आपापल्या घरी परतणार आहेत. पदकविजेते देवेंद्र झझारीया, योगेश कथुनिया, सुमीत अंतिल यांच्यासह सर्व खेळाडूंनी चाहत्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला व पाठिंब्याबद्दल
आभारही मानले.