पुणे: करोनाच्या संकटाशी झुंजणाऱ्या पुणे आणि मुंबईकरांसाठी सुखद बातमी समोर आली आहे नैर्ऋत्य मान्सून अर्थात मोसमी पावसाने रविवारी अखेर पुणे आणि मुंबईतही आपली सलामी दिली आहे. तर, हवामान खात्याच्या माहितीनुसार, मोसमी पावसाने अंदाजाच्या एक दिवस आधीच संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. दरम्यान, मान्सूनचे आगमन झाले असले, तरी तूर्तास पावसाची प्रतीक्षा आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या मान्सूनची वाटचाल चक्रीवादळ निवळताच मंदावली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पोषक ठरले. त्यांनंतर मान्सून मोठी मजल मारत सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील हर्णे बंदर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या काही भागापर्यंत आगेकूच केली.
त्यानंतर शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती केली होती. शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनने प्रगती केली. पण कोकण किनारपट्टीवर मान्सूनने कोणतीही प्रगती केली नव्हती. तर रविवारी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे पुणे वेधेशाळेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्रही निवळून गेले आहे. त्यामुळे मान्सून दाखल झाला, असला तरी पावसाचा जोर अद्याप सुरू झालेला नाही.