“मिहीर, एक गणिती कोडं आहे. देणार का उत्तर?”
“काय आहे कोडं?”
“आठ अधिक पाच किती?”
“प्रणव, काय चेष्टा करतो का माझी? याचे उत्तर तर पिंट्या पण देईल.”
“पिंट्याचा प्रश्न तुला कसा विचारेन? तुला विचारलेले कोडं आहे, इतके साधे-सोपे थोडेच असेल? कर विचार कर.”
“मिहीर, प्रणवने तुला विचारलेले कोडे सोपे आहे फक्त जरा फसवं आहे.” प्रणवची आई मुलांच्या गप्पात सामील होत बोलली.
“फसवं म्हणजे?” मिहीरने गोंधळून विचारले. “हे समजण्यासाठी एक गोष्ट थोडक्यात सांगते”, असं म्हणत प्रणवच्या आईने गोष्ट सांगायला सुरुवात केली.
एका राजाच्या दरबारी बिरबिलासारखी हुशार रत्ने होती. त्यांच्या हुशारीची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यांच्या हुशारीची परीक्षा घ्यायला लांबलांबची लोक यायची; पण ही रत्ने सर्वांना पुरून उरली होती. एकदा असाच एक प्रश्न या साऱ्या राजदरबाऱ्यांना विचारला, सत्तावीसमधून नऊ गेले तर किती राहिले? तू कसा आता आश्चर्यचकित झाला होतास तशीच सारे राजदरबारी चकित झाले, गोंधळात पडले. पण ज्या अर्थी असा प्रश्न विचारला आहे त्याअर्थी तो विचार करायला लावणारा आहे, हे निश्चित होते.
राजाचा प्रधान तो तर सगळ्या रत्नातील हुशार, त्यामुळे सगळीजण त्याच्याकडे अपेक्षेने बघत होते आणि प्रधानाने नेहमीप्रमाणे कुणाला नाराजही केले नाही. पण सत्तावीस वजा नऊ बरोबर “शून्य’ हे त्याचे उत्तर ऐकून सगळीजण बुचकुळ्यात पडली. प्रधानाने स्पष्टीकरण दिले, राजन, सत्तावीस नक्षत्रांपैकी नऊ नक्षत्रे पावसाची आहेत आणि जर ही नक्षत्रे बिन पावसाची गेली तर काहीच पीक-पाणी होणार नाही, म्हणून उत्तर “शून्य’.
“‘अरे वा! प्रधान काय हुशार आहे ना?”
“”मिहीर हेच तर सांगायचे आहे की, बऱ्याचदा दिसताना सोपं साधे वाटते.पण त्यामागचा अर्थ काही वेगळा आहे का ते बघावे लागते. म्हणून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी एकाच दिशेने विचार न करता वेगवेगळ्या दिशेने विचार करायला शिकायला पाहिजे. त्यातून योग्य उत्तरापर्यंत पोचायचे असते.” प्रणवच्या आईने समजावून सांगितले.
“”बरं मिहीर, जर आईने सांगितलेल्या गोष्टीचा मतितार्थ समजला असेल तर माझ्या प्रश्नाचे उत्तर सांग, आठ अधिक पाच किती?” मिहीर कोड्याचे काय उत्तर देतो याची प्रणवला खूप उत्सुकता होती.
“”तसे बेरीज केली तर उत्तर तेरा येईल. पण अजून वेगळा विचार करायचा झाला तर… उत्तर एक… येईल. बरोबर आहे का?” मिहीरने जरा साशंकतेने विचारले.
“”उत्तर कसे शोधलेस ते पण सांग,” प्रणवने लगेच स्पष्टीकरण मागितले.
“”खरं सांगू घड्याळाकडे लक्ष गेले अन् जाणवले, बारानंतर परत एक, दोन अशी सुरुवात होते. म्हणजेच आठ नंतर पाच तासाने एक वाजणार, म्हणून मी “एक’ हे उत्तर दिले. बरोबर आहे ना माझ्या विचारांची दिशा?”
“”एकदम बरोबर मिहीर. शाब्बास. मिहीर, प्रणव ही गोष्ट किंवा कोड यावरून तुमच्या एक लक्षात आले का?” प्रणवच्या आईने विचारले. गणित तर्कशुद्ध विचार करायला शिकवते. बालमित्रांनो, तुम्ही पण अशी कोडी सोडवता का, कोडी सोडवताना मजा तर येतेच; पण विचारांना छान चालना मिळते, विविध दिशेने विचार करायची सवय लागते.
– विशाखा गंधे