बेंगळुरू – दाक्षिणात्य नेते उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्माविषयी उठलेली वादाची राळ अजूनही हवेतच असताना आणखी एका बड्या दाक्षिणात्य नेत्याने मोदींच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार नीच आणि घृणास्पद असल्याचे वक्तव्य केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, मोदींचे केंद्र सरकार हे गरीब विरोधी आणि भांडवलदारांचे सरकार आहे. केंद्रातील भाजप सरकार “घृणास्पद’ आहे.
केंद्र सरकारने कर्नाटक राज्याला अतिरिक्त तांदूळ पुरवठा करण्यास नकार दिल्याने सिद्धरामय्या यांच्या अंगाचा तिळपापड झाला आहे. कर्नाटक सरकारने “अन्न भाग्य योजनेंतर्गत’ प्रत्येक लाभार्थ्याला अतिरिक्त 5 किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी राज्य सरकारने केंद्राकडे तांदूळ पुरवठा करण्याची मागणी केली होती.
सिद्धरामय्या म्हणाले, ‘मागील कार्यकाळात मी मुख्यमंत्री असताना जनतेला सात किलो तांदूळ मोफत दिले होते. मात्र, आधीच्या भाजप सरकारने ते कमी करून पाच किलो केले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी अतिरिक्त पाच किलो तांदूळ देईन, असे आश्वासन दिले होते.
सिद्धरामय्या म्हणाले की, आमचे सरकार आणि भारतीय अन्न महामंडळ यांच्यात तांदूळ पुरवठ्यासाठी करार झाला होता, परंतु केंद्राने आम्हाला तांदूळ देण्यास नकार दिला. आम्ही फुकट तांदूळ मागितला नाही. त्यासाठी आम्ही पैसे द्यायला तयार होतो. आम्ही आमच्या पाच हमी योजना राबवू आणि राज्याचे दिवाळखोरी होऊ देणार नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.
कर्नाटकात सत्तेत आल्यास महिलांना सरकारी बसमध्ये मोफत प्रवास, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील एका महिलेला दरमहा दोन हजार रुपये, गृह ज्योती बिजली अंतर्गत प्रत्येक घरात 200 युनिट मोफत देण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले होते. तर अन्न भाग्य योजनेंतर्गत प्रत्येक दारिद्य्र रेषेखालील कुटुंबाला 10 किलो तांदूळ मोफत देण्याचीही योजना आहे.