नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आणखीन 75 शिख भारतीयांची सुटका करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले. या सर्व नागरिकांना काबूलमधून दुशान्बे मार्गे भारतात आणले जात आहे.
आज रात्रीपर्यंत या सर्वांना भारतात आणले जाईल, असे दिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले. या भारतीयांच्या सुटकेसाठी त्वरित केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचे विशेष आभार आहेत, असेही सिरसा यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानमधील सर्व भारतीयांच्या सुरक्षित माघारी येण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी दररोज दोन विमाने अफगाणिस्तानमध्ये पाठवले जाणार आहे. कालच तेथील 400 भारतीयांना भारतात परत आणले गेले होते.