प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 –अण्णा भाऊ साठे यांचा जातीच्या भिंतीपलीकडचा ऐतिहासिक सुसंवाद आज संस्कृतीच्या विकासाचे अधिष्ठान आहे. प्रतिभावंत आणि कलावंतांना धर्म नसतो. अण्णा भाऊ तर विश्व स्वातंत्र्याचे पाईक होते. एकूणच त्यांनी ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विश्वात्मकता गौरवून संतत्व पूजले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
दुर्वा एजन्सी प्रकाशित आणि वि. दा. पिंगळे लिखित “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रकाशक शैलेंद्र कदम, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे, मसापचे कार्यवाह ऍड. प्रमोद आडकर, क्रांतिसूर्य लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले आदी यावेळी उपस्थित होते.
विश्वाच्या कल्याणासाठी बहुसांस्कृतिक एकात्मता महत्त्वाची आहे. शाहीर अण्णांनी त्यांच्या पोवाड्यांमधून मार्क्स, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजीराजे गौरविले. लोकमान्य टिळकांच्या देशभक्तीला वंदन केले आहे. शाहिरांचे प्रचारीक अनुबंध कॉ. डांगे, डॉ. आंबेडकर, आचार्य अत्रे आणि अगदी अमर शेखपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत त्यांच्या अर्पण पत्रिकेतून स्वयंसिद्ध आहेत. तेव्हा अण्णा भाऊ विश्वात्मक कलावंत आहेत, असे डॉ. सबनीस म्हणाले.
अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून वंचित, शोषित आणि दुर्बळ घटकांचे दुःख आणि व्यथा मांडल्या. त्यांनी साहित्यातून विषमता दूर करण्याचे प्रयत्न केले. परंतु, आज भारताच्या सर्वोच्चपदी महिला विराजमान होत असताना नाशिकमधील शाळेत केवळ मासिक धर्म आला म्हणून वृक्षारोपणासाठी विद्यार्थिनीला रोखले जाते. हा विरोधाभास आजही समाजात दिसून येतो हे विषण्ण करणारे चित्र आहे, अशी खंत चाकणकर यांनी व्यक्त केली. पांडे, कदम, डाकले, आडकर यांचेही भाषण झाले.