नगर -राज्यासह जिल्ह्यात उष्णतेची लाट असून,उष्माघाताचा धोका असल्याने त्याचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य, महिला व बालकल्याण पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागही सज्ज झाला आहे. केवळ मनुष्यांना उष्माघाताचा धोका आहे असे नव्हे, तर जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळिशी पार झाल्याने जनावरांना विविध आजारदेखील उद्धभवू शकतात. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे आता क्रमप्राप्त झाले आहे.
याबाबत पशुसंवर्धन विभागाने काही सूचना दिल्या आहेत. त्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी केले आहे. उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने करावयाच्या उपाययोजना सांगितले असून, त्यानुसार जिल्हाभरात या उपयोजनांची अवलंब करण्याचे निर्देश पशुसंवर्धन अधिकारी यांना दिले आहेत.
सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना जनावरे चरण्यास सोडावे. मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी द्यावे. बैलांकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. अनेकदा जागेअभावी किंवा अन्य कारणाने जनावरे दुपारच्यावेळी भरउन्हात बांधली जातात.
याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांना उन्हाचा चटका बसू नये, यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे त्यांना थंड वातावरणात चारा टाकावा. म्हशींना उन्हाळ्यात अधिक त्रास होतो, त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी, अशी माहिती डॉ. तुंबारे यांनी दिली.