पिंपरी – विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी राज्यभरात संप पुकारला आहे. पिंपरी-चिंचवडमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा ४५० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत येणा-या सर्व अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ११ डिसेंबर पर्यंत हा संप सुरुच राहणार आहे.
गेल्या पाच वर्षांत मानधन वाढ दिली नाही, ती देण्यात यावी, पटसंख्या कमी असल्याच्या नावाखाली अंगणवाड्या बंद करण्याचा शासनाचा विचार मागे घ्यावा, पोषण ट्रॅकर अॅप मराठीत द्यावे, मदतनीस, सेविका व मुख्य सेविकांच्या रिक्त जागा भरणे, पदोन्नतीला प्राधान्य देणे, दिवाळीला तुटपुंजी भाऊबीज न देता एका महिन्याच्या मानधनाइतका बोनस देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी हा बंद पाळण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचाही आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.
गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. शासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलने केली, तरीही शासनाला जाग येत नाही. शासनाला जाग यावी म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत. येत्या ११ डिसेंबर रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड, दापोडी, बोपोडी अशा ८ प्रकल्पातील अंगणवाडी सेविका नागपूर येथे जाऊन हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहेत. ज्यांना शक्य नाही, त्या महिला पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाणार आहेत, अशी माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली.
आशा सेविकांना मानधन वाढ, आम्हाला का नाही ?
अंगणवाडी सेविकांनंतर काम सुरू केलेल्या आशा वर्कर यांना शासनाने मानधन वाढ दिली. मात्र, गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना दिली नाही. सात ते आठ महिन्यांपासून अंगणवाड्यांचे भाडे थकले आहे. कुपोषण टाळण्यासाठी देण्यात येणा-या आहारात दुजाभाव केला जातो. शहरातील काही ठिकाणी बालकांना किराणा दिला जातो. तर, काही ठिकाणी सुकडी दिली जाते. सुकडी निकृष्ट दर्जाची असते, पालक ते फेकून देतात, असे आरोप अंगणवाडी सेविकांनी केले आहेत.
आरोग्य, लसीकरण, आहार, खिचडी यासारख्या सहा योजनांवर आमची नियुक्ती आहे. यासोबतच पाळणाघर, आभा कार्ड काढण्याचे काम अंगणवाडी सेविकांना दिले आहे. आधार कार्ड आम्हीच काढून दिले. पोलिओ निर्मूलन आम्हीच केले. आयुष्यमान भारत कार्ड घरोघरी पोहोच केले. बालविवाह रोखून धरले. एवढी कामे करुनही नवीन योजना येताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. ही कामे करताना मुलांना कुठे सोडायचे ?, अंगणवाड्यांचे भाडे वेळेत मिळत नाही. आम्हाला पगारवाढ दिली जात नाही. सरकारने असा दुजाभाव करु नये.
– छाया जाधव, अंगणवाडी सेविका