सुशांतसिंह राजपूतने नैराश्यातून आत्महत्या केली. त्याचा सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी स्वतःच्या निराश अवस्थेतील अनुभव सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली.
काहींनी बॉलीवूडमध्ये कसे चुकीच्या पद्धतीने हाताळले जाते, याचे आरोपसत्र सुरू केले. बॉलीवूडमध्ये लोकांना श्रेय मिळू दिले जात नाही, याचा पाढा वाचायला सुरुवात केली. या सर्व प्रकारावर सोनाक्षी सिन्हाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या निमित्ताने सोशल मीडियावरून पब्लिसिटी मिळवण्याचा हा प्रकार थांबायला हवा, असे तिने ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“डुकरांबरोबर कुस्ती खेळल्याने तुम्हीच घाण होता आणि डुकराला मजा वाटते. आमच्या व्यावसायिक बंधूच्या मृत्यूच्या आधारे नकारात्मकता पसरवणारे आणि स्वतःचे इश्यूज हायलाईट करणारे लोक हेच करत आहेत. ते त्यांनी थांबवायला पाहिजे.
तुमचे लिखाण, नकारात्मकता, द्वेषभावना आणि विषारीपणा याची खरोखर काहीही गरज नाही. जो आपल्यातून निघून गेला आहे, त्याच्याबद्दल थोडा आदर बाळगावा.’ असे सोनाक्षीने म्हटले आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. पण हे लोक नेहमीच तिरस्करणीय असतात आणि ते तसेच राहतील, असेही सोनाक्षीने म्हटले आहे.