मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच अभिनेत्री ‘हेमांगी कवी’ आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सोशलवर तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. हेमांगीला सोशलवर शेअर केलेल्या पोस्टमुळे कधी नेटकऱ्यांकडून दाद मिळते तर कधी तिच्यावर टीकाही केली जाते. दरम्यान, नुकतंच हेमांगीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये ती खूपच भावुक झाल्याचं दिसून आलं आहे. अभिनेते सुनील होळकर यांच्या निधनानंतर तिने ही पोस्ट केली आहे.
आपल्या पोस्ट मध्ये हेमांगी म्हणती, “काही दिवसांपुर्वी पराग बेडेकर गेला, आता सुनील होळकर..! आपल्या ओळखीची, सतत हसतमुख, जिंदादील माणसं जेव्हा अशी अचानक निघून जातात तेव्हा खरंच काही वेळ काय करावं, काय बोलावं सुचत नाही! डोक्यात आधी चाललेल्या विचारांची चक्र अचानक थांबतात.
सुन्न.. जे कळलंय ते खरं आहे का? असं कसं शक्य आहे? अरे कालच तर त्याने मेसेज केला होता! हे सगळं process व्हायला वेळ लागतो आणि process जरी झालं तरी पराग आणि सुनील… मित्रांनो, Not done!” या आशयाची पोस्ट तिने केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी दि. 13 जानेवारी रोजी मराठमोळा अभिनेता सुनील होळकर यांचं निधन झालं. ते 40 वर्षांचे होते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’सह अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सुनील यांच्या निधनानंतर कलाविश्वाला दुःखद धक्का बसला आहे.