– अरुण गोखले
माणसाला त्याच्या हितापासून प्रवृत्त करणारे, त्यास सन्मार्गावरून सदाचरणापासून मागे ओढणारे, त्यास मानत्वाकडून देवत्वाकडे जाताना त्याचा पाय मागे ओढणारे जे सहा शत्रू आहेत. त्यामध्ये मद, मोह, मत्सर, दंभ, लोभ आणि अहंकार या सहा रिपू मधला अहंकार हा अत्यंत घातक असा शत्रू आहे.
अहंकार, गर्व, ताठा हा माणसाच्या मनात कधी कसा आणि कोणत्या रूपाने अलगद प्रवेश करील ते सांगता येत नाही. गर्व, ताठा ही सर्व त्या अहंकाराचीच विविध रूपे आहेत. बरं कोणास कशाचा अहंकार वाटेल हेसुद्धा नेमकेपणाने सांगता येत नाही. कारण आपल्या रूपाचा, सौंदर्याचा, सुंदरतेचा अहंकार हा जसा स्त्रियांना असतो तसेच आपली शक्ती, सामर्थ्य, श्रीमंती, धनदौलत, मालमत्ता, हाती असलेली सत्ता याचा अहंकार हा पुरूषांना असतो.
या अहंकाराचेही दोन प्रकार आहेत, एक सात्विक अहंकार आणि दुसरा तामसी अहंकार. तामसी अहंकार हा तर जीवास घातक आहेच, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्याचे अनेक दाखले आपण वाचले, ऐकले आणि अनुभवलेलेही आहेतच. इथे असा प्रश्न येतो की सात्विक अहंकार म्हणजे काय? तो कुणाला होतो?
तर त्या संदर्भात आपले साधू, संत, सत्पुरुष हे आपल्याला असे सांगत असतात की “बाबाहो! अहंकार, गर्व, ताठा या गोष्टी जीवास त्याच्या प्रगतीपासून दूर लोटणाऱ्या आहेत. “गर्वाचे घर खाली’, असे म्हटले जाते. अहंकाराने जसा प्रपंच्यात घात होतो तसेच पारमार्थिक जीवनातही प्रत्येकाने त्याला होणाऱ्या सात्विक अहंकाराच्या बाधेपासून, त्या घातकी अहंकाराच्या वाऱ्यापासून दूर राहायला हवे’.
मी ईश्वराचा भक्त आहे, भाविक आहे, असा जो एक अहंकार माणसाच्या मनात निर्माण होतो तोसुद्धा जीवास होऊ नये. सद्भक्ताचे, वैष्णववीरांचे मन हे सर्वदा अहंकार रहित राहावे अशीच मागणी संत नामदेवांनी पांडुरंगा जवळ केली आहे. ती मागणी करताना ते म्हणतात, की बा पांडुुरंगा! तुझी ही सर्व भक्त मंडळी सदासुखी व समाधानी असू देत. त्याचे खरे सुख आणि समाधान मोडू पाहणारा अहंकाराचा वारा हा त्यांना कधीही लागू देऊ नकोस. हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.