– अरुण गोखले
त्याचं काय आहे की, प्रपंच्यात ज्या गोष्टी आवर्जून केल्या जातात किंवा कराव्या लागतात त्याच्या अगदी विरुद्ध आपल्याला परमार्थात करावे लागते. या कारणासाठीच असं म्हणावं लागतं की “प्रपंच हा सुलटा आहे तर परमार्थ हा उलटा.’
आता या उलट्या-सुलट्याचा गुंता सोडवायचा झाला, तर त्यासाठी आपल्याला विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टींचा मोठा आधार घ्यावा लागतो. मी, माझे, माझा, माझ्यासाठी आणि मला हवा तसा माझा प्रपंच हा माझा मीच मांडत असतो. संसाराचा खेळ खेळत असतो. तिथे मी माझ्यापेक्षाही इतरांचा म्हणजेच माझे आई-वडील, भाऊ-बहिणी, पत्नी, मुले, सगेसोयरे यांचा विचार करत असतो.
काया, वाचा, मने आणि धनाने, कष्टाने आणि सेवेने त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करीत असतो. हे करीत असताना माझं बरेचसे आयुष्य हे केवळ त्यांना सुखी समाधानी करण्यात खर्च झालेले असते. हे सारे करीत असतानाच कुठेतरी माझ्या मनात हा स्वार्थी विचार असतोच की, आज मी त्यांची सेवा करतोय, काळजी घेतोय, उद्या मी म्हातारा झाल्यावर त्यांनी माझी काळजी घ्यावी.
पण वास्तवात ते सुख सर्वांच्याच वाट्याला आणि तेही आपल्याला हवं तसं येत असं नाही. त्या वेळी कळत-नकळत माझ्यासमोर हा प्रश्न उभा राहतो की, मी आजवर इतरांचा विचार केला; पण मी माझ्या स्वत:चा विचार करायला नको का?
कारण कितीही नाही म्हटले, तरी हा प्रपंच्यातला व्यवहार आहे. इथली माया, ममता, प्रेम, आस्था ही ज्याच्या त्याच्या स्वार्थावर अवलंबून आहे. इथला आपलेपणा, जवळीक, साथ सोबत ही एका ठराविक मर्यादेपर्यंतची आहे आणि मग त्या एकटेपणात खरा विचार सुरू होतो तो परमार्थाचा.
प्राप्त जीवन सार्थकी लावण्यासाठी, मला स्वानंद देणारा, माझ्या सोबत जन्मोजन्मी राहणारा मला अंतर्बाह्य सांभाळणारा, माझ्यातला तो म्हणजेच परमात्मा. तो अंतरीचा आत्माराम हा ओळखण्याचा मी प्रयत्न केला का? मी माझ्या कोहं म्हणजे मी कोण?
या प्रश्नाचे उत्तर शोधले का? कारण हे जर करायचे तर त्यासाठी माया तोडावी लागते, आसक्ती सोडावी लागते. इथला खरा शोध हा डोळे उघडून नाही तर डोळे मिटून आणि बाहेर नाही तर आत करावा लागतो. त्यासाठीच परमार्थात प्रपंच्याच्या सारेच उलटे असते.