अमरावती – जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली नगरपंचायतीच्या 30 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून सुरु झालेल्या मतदानाला कडाक्याच्या थंडीमुळे फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र 95 वर्षांच्या आजीने मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावत नागरिकांचा उत्साह वाढविला.
पार्वतीबाई शेंद्रे या 95वर्षांच्या आजीबाईने मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये पार्वती आजीने मतदान केले आहे. तसेच लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवानही त्यांनी सर्व मतदारांना केले.
दरम्यान, तिवसा नगरपंचायतसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 32.33 टक्के मतदान झाले आहेत. तर भातकुली नगरपंचायतसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 49.63 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.