नवी दिल्ली – पश्चिम बंगाल आता विकासाच्या वाटेपासोन कोसो दूर गेल्याचे सांगत बेरोजगारी, दहशतवाद आणि भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाल्याचे सांगत, खुद्द मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना सत्तेतून दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे “चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे आणि सध्या केंद्रिय गृहमंत्रीपद सांभाळत असलेले अमित शहा आता पश्चिम बंगालच्या भेटीवर येत आहेत. याद्वारे शहा यांनी बॅनर्जी यांच्या कथित जुलमी राजवटीविरोधात रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.
पश्चिम बंगालमधील नजिकच्या भविष्य काळातील विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोलकता येथे जाणार होते. मात्र, अचानकपणे ही व्यूहरचना बदलत, अमित शहा यांनी आपला दौरा जाहीर केला आहे. ते गुरुवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी वर्धमान जिल्ह्यात एक बैठक घेणार असून या बैठकीत वर्धमान आणि मिदनापूर येथील मतदान केंद्र कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर शुक्रवार, दि. 6 रोजी कोलकता येथे कोलकता आणि नवदीप येथील विभागीय प्रमुखांना शहा मार्गदर्शन करणार आहेत.
या दोन्ही बैठकींच्या वेळी शहा यांच्यासमवेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची एक भली मोठी फौजही असेल, असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी जाहीर केले आहे. बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघ असून तेथे घुसखोर विदेशी नागरिकांचाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शहा यांनी राज्य भाजपला स्पष्ट सूचना देताना असे सांगितले आहे की, प्रत्येक मतदारायादीतील प्रत्येक पानावरील प्रत्यक मतदाराची खरीएखुरी ओळख पटवून त्यांच्यापर्यंत भाजपाचे काम पोहोचवायचे आहे.
तसेच भाजपाचे बंगालमधील खासदार स्वपन दासगुप्ता यांनी सांगितले की “मिशन वेस्ट बेंगॉल’ या कार्यक्रमांतर्गत 20 डिसेंबर 2020 ते 21 जानेवारी 2021 अखेर एक महिन्याचा उद्योजक मेळावा पक्षातर्फे आयोजित केला जाणार असून, यादरम्यान जास्तीतजास्त उद्योजकांना पश्चिम बंगालमध्ये उद्योग सुरु करण्यासाठीए निमंत्रीत केले जाणार आहे.
भाजपा आणि अमित शहा यांचा पवित्रा पाहता, आता विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आगामी निवडणुकीत मोठे आव्हान मिळणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.