नवी दिल्ली -लॉकडाऊन भंगावरून राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यासाठी स्वीकारण्यात आलेल्या निकषांबाबत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मंगळवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशीच पथके गुजरातलाही पाठवावीत, असे आव्हानही त्यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना दिले.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे. मात्र, काही राज्यांत लॉकडाऊनच्या नियमांचा भंग होत असल्याचे दिसून येत आहे. त्यापार्श्वभूमीवर, करोना फैलाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी काही राज्यांत केंद्रीय पथके पाठवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला. ती पथके पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांना भेट देणार आहे. मात्र, त्या पाऊलावर काही राज्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पटेल यांनी मोदी सरकारला आणि प्रामुख्याने शहा यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडक राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली जाऊ नयेत. सर्वच राज्यांमध्ये पथके पाठवली जावीत. मोदी सरकारच्या विधायक सूचनांचा लाभ सर्वच राज्यांना व्हावा, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया पटेल यांनी ट्विटरवरून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा हे गुजरातचे आहेत. त्यामुळे पटेल यांच्या प्रतिक्रियेला महत्व आहे.