Rahul Gandhi – देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पलटवार केला. शहांना बहुधा इतिहास माहीत नाही. ते इतिहासाचे पुनर्लेखन करत असतात, अशी उपरोधिक टिप्पणी राहुल यांनी केली.
शहांनी नुकतेच संसदेत बोलताना काश्मीर मुद्द्यावरून नेहरूंवर टीका केली. त्याविषयी राहुल यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. पं.नेहरूंनी त्यांचे संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले. त्यासाठी त्यांना अनेक वर्षे तुरूंगवास भोगावा लागला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जातनिहाय जनगणना हा मुख्य मुद्दा आहे. त्यापासून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. जातगणना, देशाचा पैसा कुणाच्या हातात जात आहे या मुद्द्यांवर भाजपला चर्चा नकोय. मात्र, कॉंग्रेस ते मुद्दे पुढे नेईल. त्याशिवाय, गरिबांना त्यांचे हक्क मिळण्याची निश्चिती करेल, असा निर्धारही राहुल यांनी व्यक्त केला.