दत्तात्रय पवार
कुडाळ – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रात पक्षबांधणीस जोरदार सुरुवात केली आहे. दस्तुरखुद्द विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले असून या आठवड्यात त्यांचा सातारा जिल्ह्यातील दुसरा दौरा होत आहे. या दौऱ्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यातील मेढा येथे रविवारी दुपारी 4 वाजता होणाऱ्या मेळाव्यात अजित पवार यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमित कदम यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होत असून ते पुन्हा पक्षात सक्रिय होणार आहेत. या मेळाव्यानिमित्ताने सातारा विधानसभा मतदारसंघात अजितदादा घड्याळाला चावी देणार असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या दृष्टीने अजित पवार या मेळाव्यात नेमके काय बोलतात याकडेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पक्षाची स्थापना झाल्यापासून 1999 पासून जावळी तालुका बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघात 1999 ते 2019 पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस आपली सत्ता प्रस्थापित करीत आली आहे. मतदारसंघात 2019 चा अपवाद वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच उमेदवार निवडून आला आहे. पुढील 2024 ची विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे.
मेढा येथील उद्या रविवारी होणाऱ्या मेळाव्यात अमित कदम पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सक्रिय होणार आहेत. माजी आमदार कै. जी. जी. कदम यांचे सुपुत्र अमित कदम यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये अर्थ व शिक्षण समिती सभापतिपदावर उत्कृष्ट काम करून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. आजही सातारा, जावळी व महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये जी. जी. आण्णा कदम यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग कार्यरत आहे. त्यामुळे ही मोठी ताकद अमित कदम यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे.
कदम यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे कोरी पाटी समजून युवक ज्येष्ठ नागरिक, महिलावर्गाचा मोठा पाठिंबा अमित कदम यांना मिळत आहे. त्यामुळे माजी आमदार सदाशिव सपकाळ सर्वसामान्यांचे आमदार म्हणून 1995 मध्ये शिवसेनेतून निवडून आले. त्याचीच पुनरावृत्ती सर्वसामान्यांचा आमदार म्हणून अमित कदम यांच्या माध्यमातून होऊ शकते, असा विश्वास तालुक्यात व्यक्त होत आहे. त्यामुळे अमित कदम यांचा प्रवेश राष्ट्रवादी कॉंग्रेसला नक्कीच बळकटी देणार ठरणार आहे.
मतदारसंघाला निधी देऊन प्रश्न लावले मार्गी
महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांनी सातारा व जावळी तालुक्यासाठी भरीव निधी देऊन मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले होते. यावरून या मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विशेष लक्ष अधोरेखित होत आहे. त्यामुळे एकूणच या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.