नवी दिल्ली: लॉकडाऊन मुळे छोट्या दुकानदारांचे उत्पन्न पूर्ण बुडले असून त्यांच्यावर आता उपासमारीची पाळी आली असल्याने सरकारने या छोट्या दुकानदारांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची अनुमती दिली पाहिजे, अशी मागणी किरकोळ विक्रेत्यांच्या महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.
देशात जवळपास चार कोटी छोटे आणि मध्यम दुकानदार आहेत. त्यांच्या देशभरात 34 संघटना आहेत. त्या सर्व संघटनांनी आपल्या सदस्यांचे जे हाल सुरू आहेत त्याची कैफीयत महासंघाला कळवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दुकानातील माल विक्री अभावी तसाच पडून असल्याने त्यांचे भांडवल त्यात मोठ्या प्रमाणात गुंतले आहे.
आयुष्यभर केलेल्या बचतीच्या आधारावर त्यांना सध्या घरखर्च भागवावा लागत असून ती बचतही आता संपत आली आहे. या महासंघाचे अध्यक्ष राम असरे मिश्रा यांनी म्हटले आहे की पंतप्रधान मोदींनी या छोट्या व्यावयसायिकांची अडचणी समजून घेऊन त्यांना थोडा तरी दिलासा दिला पाहिजे. या दुकानदारांचे जे नुकसान झाले आहे त्यासाठी या लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण निधीतून मदत पॅकेज जाहींर करण्याची मागणीही मिश्रा यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, किरकोळ विक्रेत्यांसाठी मार्च ते जून हा व्यवसायाचा सिझन असतो पण हा सारा सीझन लॉकडाऊनमुळे वाया गेल्याने त्यांच्या भविष्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे.