इंदापूर – पुणे जिल्ह्यात एकूण 231 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला 158 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर भाजपाला 19, शिवसेना शिंदे गटाला 4, कॉंग्रेस 11, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला 5, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, अपक्ष 29 तर 1 ग्रामपंचायत रिक्त राहिली आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पुरस्कृत असलेल्या पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळविलेले आहे. याबाबत इंदापूर येथे सोमवारी (दि. 6) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गारटकर बोलत होते. गारटकर म्हणाले, राजकीय वर्तुळात जी चर्चा चालली होती, तसा परिणाम अजितदादांच्या नेतृत्वावर दिसून आला नाही.
आरक्षणाच्या प्रकरणात दादांची इमेज डागाळलेली नाही. जिल्ह्यातील जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठे यश आले आहे. त्यामुळे अजितदादांच्या गटाला जनतेचा कौल मिळाला आहे. अजित पवार हे विकासाला चालना देणारे नेतृत्व आहे. तसेच पुणे जिल्ह्यात त्यांनी घेतलेला निर्णय, या निवडणुकीत जनतेला मान्य झाले असून, येणाऱ्या काळात महायुतीचीच सत्ता येईल, असा दावा गारटकर यांनी केले.
प्रदीप गारटकर म्हणाले, देशात नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. त्या पाठोपाठ अजित पवार देखील राज्यात मुख्यमंत्री होतील. हे माझे मत आहे. त्यामुळे आता जनता विकासकामांना मतदान करीत आहे, हे सिद्ध झाले आहे. जनतेला विकास हवा आहे. जनता गटतट पाहणारी नसून, सुज्ञ झाली आहे.
इंदापूरला पाच ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे
इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व मिळाले हे मान्य आहे; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने शेळगाव, काझड, वकीलवस्ती, शिंदेवाडी, लाकडी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले असून, विरोधक इंदापूर तालुक्यात रेटून खोटे बोलत आहेत. असे हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता, गारटकर यांनी पाटील टीका केली.