नवी दिल्ली – महायुती सरकार मजबूत करण्यासाठी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी जे सहकारी मित्र सोबत येतील त्यांचे सर्वांचे स्वागत आहे. आम्ही सर्वजण हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने अथवा राष्ट्रवादीचे नेत्यांना मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही, अशी स्पष्टोक्ती राज्य उत्पादन शुक्ल मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. तसेच अद्याप मंत्रिमंडळात 14 जागा शिल्लक आहे, त्याचाही लवकरच विस्तार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महायुती सरकारच्या वतीने राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची आणि निर्णयांची माहिती देण्यासाठी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
मागील वर्षभराच्या कालावधीत महायुती सरकारने जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून एकनाथ शिंदे यांनी काम केले. राज्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला होता, त्याला संकटातून सोडवण्याचे काम महायुती सरकारने केले.
एनडीआरएफचे निकष बदलून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. तसेच राज्यात 29 जलसिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली. यामुळे राज्यातील काही लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा महायुती सरकारने मिळवून दिला. यासारखे विविध निर्णय राज्य सरकारने गेल्या एक वर्षाच्या कालावधीत घेतले आहेत. तर शासन आपल्या दारी या उपक्रमातून ठाणे जिल्ह्यात सुमारे तीन लाख नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.