मुंबई – बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहेत. लग्नापूर्वी या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र लग्नानंतर दोघांनी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले नाही. ऐश्वर्याच्या एका निर्णयामुळे ही जोडी पुन्हा चित्रपटात एकत्र दिसली नाही.
ऐश्वर्या रायला ‘दोस्ताना’ हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि प्रियांका चोप्रा हे कलाकार होते. या चित्रपटात प्रियांकाने नेहाची भूमिका साकारली होती. ही भूमिका ऐश्वर्याला दिली होती. मात्र ऐश्वर्याने या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला. यामागचे कारण आता समोर आले आहे. या चित्रपटात अभिषेकची भूमिका जरा वेगळी होती. तिच्यामुळे तो व्यवस्थित भूमिका साकारू शकणार नाही आणि याचा परिणाम दोघांच्या नात्यावर होईल असा ऐश्वर्याचा समज होता. त्यामुळे तिने पती अभिषेकसोबत हा चित्रपट करण्यास नकार दिला.
याशिवाय दोस्ताना चित्रपटात जॉनची भूमिका सैफला दिली जाणार होती. मात्र अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाल्याने या चित्रपटात त्यांना अधिक महत्त्व दिले जाईल, असे त्याला वाटले. त्यामुळे सैफने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचेही म्हंटले जाते. मात्र ऐश्वर्यानेच ऑफर नाकारल्याने चित्रपटात प्रियांकाची आणि सैफच्या जागी जॉनची एंट्री झाली.
दरम्यान, 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघांनी ‘कुछ ना कहो’, ‘उमराव जान’, ‘धूम 2’, ‘सरकार’, ‘गुरु’, ‘रावण’ आणि ‘सरकार राज’ या चित्रपटात काम केले. मात्र लग्नानंतर या दोघांनी एकत्र काम केले नाही.