अमोल मतकर
संगमनेर – तालुक्यात ठिकठिकाणी अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडत आहेत. दररोज चैन चोरी, मोटारसायकलची चोरी, घरफोडी, एटीएम फोडणे यासारखे प्रकार घडताना दिसत आहेत. तर शहरात गांजा, मटका, ड्रग्ज, अवैध दारू विक्री, अवैध कत्तलखाने असे अनेक अवैध धंदे बिनदिक्कत सुरू आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडत असल्याचे सामान्य नागरिक सांगतात. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे सगळं घडतं ते फक्त पाहण्याची भूमिका घेऊन डोळेझाक करत असल्याचेही दिसून येते.
काही दिवसांपूर्वी घारगाव परिसरात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. अजूनपर्यंत त्याची ओळख पटलेली नाही. उलट तो ज्या व्यक्तीच्या घरी शेतीकाम करण्यासाठी होता, त्याच व्यक्तीची उलट तपासणी करून आर्थिक तोटा सहन करावा लागल्याची चर्चा घारगाव परिसरात होत आहे. येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक डिटेक्शनला कमी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शनिवारी (दि 20) रायते वाघापूर परिसरात एका विहिरीत तरुणाचा मृतदेह सापडला.
दोन दिवस झाले असले तरी अजून त्याची ओळख पटली नाही. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वेल्हाळे परिसरात ताडी बनवण्याचे सर्वात मोठे केंद्र होते. ते पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त करत कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा संगमनेर शहरात अथवा तालुक्यात येऊन गांजा, ड्रग्जवर कारवाई करते. तसेच कसायांवरही कारवाई करायला बाहेरचे पोलीस येतात मग स्थानिक पोलिसांना हे सगळं का दिसत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय सुरू आहे. काही मटकामालक तर दवाखान्यात राहून संपूर्ण संगमनेर तालुक्यात मटका व्यवसाय सांभाळत आहे. त्यामुळे त्याच्या नेटवर्कला सांभाळण्याचे काम स्थानिक प्रशासनातील कोणते लोक करत आहेत, हे शोधून काढणे महत्वाचे आहे. मटक्यामुळे तरुण विद्यार्थी बिघडत आहे. शहरात ठिकठिकाणी चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. दररोज गाड्यांच्या चोऱ्या होत आहेत.
नागरिक स्थानिक प्रशासनापासूनच त्रस्त होत असल्याची बाब चक्क एका शिक्षकाने त्यांच्या अनुभवातून सांगितली आहे. एके दिवशी घरातील लोक कामानिमित्ताने बाहेर गेल्याचे पाहून सोने आणि काही रोकड असा ऐवज काही चोरट्यांनी लांबवला. सायंकाळी ते शिक्षक घरी आल्यानंतर त्यांना सगळा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.
दोन दिवसांनी त्याच पोलीस ठाण्यातून एका कर्मचाऱ्याचा फोन आला. साहेबांनी बोलावले असे सांगितले. ते शिक्षक साहेबांच्या कॅबिनमध्ये गेले असता साहेबांनी चक्क त्यांच्या हातात पंचवीस हजार ठेऊन “काही पैसे तुम्ही टाका आणि मॅडमला सोनं करून द्या, आम्ही कधीच कुणाला नाही म्हणत पण तुम्ही चांगले आहेत म्हणून….” असे बोलल्यानंतर त्या स्वाभिमानी शिक्षाकने ते पैसे न घेता साहेब हे चुकीचं आहे म्हणत निघून गेले. याचाच अर्थ त्या साहेबांना चोर कोण होतं हे माहिती असणार. परंतु तेच “चोरावर मोर” होऊन बसल्याने त्या शिक्षकाचा मात्र प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे. एकंदरीतच संगमनेर तालुक्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले असून त्या प्रमाणात डिटेक्शन होताना मात्र दिसत नाही.