नगर – विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील “सस्पेन्स’ दिवसेंदिवस वाढत आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार या निवडणूक रिंगणात नसल्याने अपक्षांमध्ये लढत होणार आहे. आज (सोमवार) उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी सहा जणांनी माघार घेतल्याने 16 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबे हे भाजपच्या, तर अपक्ष शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या पाठिंब्याच्या प्रतीक्षेत आहे. पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला असला, तरी कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून पाठिंब्याची घोषणा झालेली नाही. भाजपला पाठिंबा मागितला की नाही याबाबत तांबेंकडून अद्यापही खुलासा झालेला नाही.
कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेत चिरंजीव सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडे उमेदवार राहिला नाही. तसेच भाजपनेदेखील उमेदवार न दिल्याने या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचा उमेदवार राहिलेला नाही. दरम्यान, आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अमोल खाडे, डॉ. सुधीर तांबे, दादासाहेब पवार, ऍड. धनंजय जाधव, राजेंद्र निकम, धनराज विसपुते या सहा उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली.
आता रतन बनसोडे (वंचित बहुजन आघाडी, नाशिक), सुरेश पवार (नॅशनल ब्लॅक पॅंथर पार्टी, नाशिक), अनिल तेजा, अन्सारी अहमद अब्दुल कादीर (धुळे), अविनाश माळी (नंदूरबार), इरफान मो इसहाक (मालेगाव), ईश्वर पाटील (धुळे), बाळासाहेब घोरपडे (नाशिक), ऍड. जुबेर नासिर शेख (धुळे), ऍड. सुभाष जंगले (श्रीरामपूर), सत्यजित तांबे (संगमनेर), नितीन सरोदे (नाशिक), पोपट बनकर (नगर), शुभांगी पाटील (धुळे), सुभाष चिंधे (अहमदनगर), संजय माळी (जळगाव, सर्व अपक्ष) असे 16 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. दरम्यान, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या.
त्यांच्या पतीचाही मोबाईल बंद होता. त्यामुळे आधीच नाट्यमय झालेल्या निवडणुकीनंतर त्या आज माध्यमांसमोर आल्या. मी उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. मी मविआची अधिकृत उमेवार म्हणून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मी मविआच्या सर्व प्रमुख नेत्यांशी संपर्क केला, अशी स्पष्टोक्ती शुभांगी पाटील यांनी माध्यमांसमोर नाशिक येथे दिली. मविआची उमेदवारी मिळवण्यासाठी माझा प्रयत्न आहे. ठाकरे गटाचा पाठिंबा मला आहे. मविआची उमेदवारी मला मिळावी असा माझा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे, त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले.
माझी उमेदवारी कायम आहे. कुणी काय सांगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले आहे. वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले हे माझ्याबाबत निर्णय घेतील. मी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये गेले. त्यांनी पक्षात या, आम्ही विचार करू, असे मला आश्वासन दिले गेले होते. परंतु माझा विचार झाला नाही. महाविकास आघाडी निश्चितच चांगला निर्णय माझ्या बाजूने घेईल. सध्या तरी पाटील मविआच्या पाठिंब्याच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपकडून अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर करण्यात आला नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे गटातही पाटील यांच्या उमेदवारीस विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. या गटातील काहींनी ऍड. सुभाष जंगले यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील “सस्पेन्स’ अजूनही वाढत चालला आहे.