निघोज – नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या पावसाने निघोज परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुधामती कवाद या कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह शेतकऱ्यांच्या थेट बांधावर गेल्या.
पंधरा दिवसांपूर्वी निघोज परिसरात झालेल्या गारपिटीच्या पावसाने शेतीची मोठी हानी झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. नुकसानीची पाहणी करून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी व सर्व परिस्थिती सरकार दरबारी मांडून मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई द्यावी, यासाठी ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद या ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, गणेश कवाद आणि कृषी अधिकाऱ्यांनाबरोबर घेऊन गेली चार दिवस नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करत आहे.
कांदा, गहू, हरभरा व इतर पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांचे रितसर पंचनामे करून तसे प्रस्ताव बनवून शासनाकडे पाठविण्याचे काम केले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.