श्रीरामपूर – माती, आकाश, ऊन, पाऊस, वायू या पंचतत्वापासून माणूस दूर गेल्याने तो असंवेदनशील बनला आहे. ग्रामीण भागातील माणसांची शेती व मातीशी नाळ जुळलेली असते. त्यामुळे शेतकरी व ग्रामीण भागावरील साहित्याला ग्रामीण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. शहरात पंचतत्वापासून दुरावल्याने संवेदनशीलता संपल्याने अशा साहित्याला दाद मिळत नाही, असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांनी केले.
अशोक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भालेराव बोलत होते. यावेळी कोंडीराम उंडे, सुरेश गलांडे, हिंमतराव धुमाळ, सोपानराव राऊत, अॕड.सुभाष चौधरी, भाऊसाहेब उंडे, बाबासाहेब आदिक, मंजुश्री मुरकुटे, योगेश विटनोर, भास्कर खंडागळे, प्रफुल्ल दांगट, काशिनाथ गोराणे, अॕड.मिलिंदराव गायकवाड, सारंगधर आसने, डाॕ.मंगेश उंडे, विजयराव आसने, राधु उंडे, सचिन पवार, काजळे काका, संतोष देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भालेराव यांनी आपल्या कवितांमधून ग्रामीण व शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना उलगताना “शेतीमध्ये माझा खोप, तिला बो-हाटीचा झाप, तिथं राबतो, कष्टतो माझा बाप!, “काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता!, “शिक बाबा शिक लढायला शिक” व “दोन जीवांची माय माझी गेली दूर…” आदी कविता सादर केल्या. त्यास उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे म्हणाले की, विद्यार्थी जीवनाचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला पाहिजे. खेळ व व्यायामामुळे जगणे सुसह्य बनते. विद्यार्थी जीवन आयुष्यात एकदाच अनुभवायला मिळते. भालेरावांच्या कवितेतून ग्रामीण व शेतकऱ्यांचे जीवनाचे पदर उलगडतात. त्यांच्या कविता वास्तवादी आहेत. त्यातून शेतकरी व कष्टकऱ्यांचे जीवन प्रतिबिंबित होते. त्यांनी “पलिकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर, झाडाझुडपात लपलेले आहे माझे घर!” ह्या काव्यपंक्ती सादर केल्या.
महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डाॕ.सुनिता गायकवाड यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या आजवरच्या वाटचालीचा धावता आढावा घेतला.विविध क्षेत्रात नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रा.सुयोग थोरात यांनी आभार मानलेल. प्रा.दिलीप खंडागळे व प्रा.रवींद्र वारुळे यांनी सूत्रसंचालन केले.