नगर – पंतप्रधान कोणीही असो त्यासाठी गर्दी ही होते. लोक जमता पण येथे वेगळेच चालले आहे. शिर्डीत होत असलेल्या पंतप्रधानाच्या कार्यक्रमांसाठी प्रशासनावर सक्ती केली जात आहे, शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव होत आहे. हे योग्य नाही. पंतप्रधानाचा देखील हे आवडणार नाही अशा शब्दात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता सोमवारी पत्रकार परिषदेत टीका केली.
आ. थोरात सोमवारी नगरमध्ये आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. यापूर्वी त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी डि. एम. कांबळे यांच्या निधनाबद्दल त्यांनी कांबळे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे, उत्कर्षा रूपवते, प्रताप शेळके, संजय झिंजे, मनोज गुंदेचा आदी उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मे महिन्यापासून निळवंडे धरणाचे 10 टीएमसी पाणी अडवून धरले. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. शिर्डीतील दर्शन रांग दीड वर्षांपूर्वीच तयार झाली, मात्र पंतप्रधानांसाठी तिचे उद्घाटन उशिरा करत भाविकांना उन्हात ताटकळत ठेवले गेले, शैक्षणिक संकूल देखील वर्षभरापासून खुले केले नाही. असाही आरोप थोरात यांनी केला. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज का करण्यात आला याचा खुलासा अद्यापि सरकारने केलेला नाही. गेल्या दीड वर्षात सरकारने मराठा आरक्षण समितीची बैठक घेतली नाही. मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यावर सरकारला जाग आली. ही समाजाची अवहेलनाच ठरते. सरकार समाजाला गृहीत धरते आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच मराठा आरक्षणाचा विषय प्राधान्यक्रमावर का घेतला नाही, असाही प्रश्न थोरात यांनी केला. राज्य सरकार खोटे आश्वासन देणारे आहे. धनगर समाजाला सन 2014 मध्ये सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण लागू करण्याचे जाहीर केले होते, अशा फसवणुकीमुळे सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे, असेही थोरात म्हणाले.
पाणी वाटपाचे समन्यायीचे सूत्र अयोग्य
जायकवाडीला पाणी सोडण्याचे समन्यायी तत्त्व मान्य असले तरी पाणी सोडण्यासाठी आवश्यक असणारे सूत्र मात्र आम्हाला मान्य नाही. ज्यावेळी सूत्र ठरले, त्यावेळी निवडणुका लागलेल्या होत्या, राज्यात ‘अधिकारी राज’ होते. अधिकाऱ्यांनी ते सूत्र ठरवले ते मान्य नाही, असे थोरात म्हणाले.
बॅंकेच्या अध्यक्षांनी बॅंकेची काळजी द्यावी
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी बॅंकेची काळजी द्यावी. एका संस्थेसाठी किती नियम सोडून मदत करावी ते ठरविले पाहिजे. संचालकांच्या परदेश दौऱ्यावर मी बोलणार नाही कारण यापूर्वी देखील संचालक परदेश दौऱ्यावर गेले होते. बॅंकेची आर्थिक शिस्त बिघडणार नाही. याचीकाळजी घेतली पाहिजे.
नगर शहरातील वाढत्या गुंडगिरी चाप बसवा
नगर शहरात वाढती गुंडगिरी पाहता सरकार व पोलिसाचे अस्तित्व येथे दिसत नाहीत. नगरच्या गुंडगिरीचा विषय मी विधानसभेत उपस्थित केला होता व येथील दहशतीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु अजूनही गुंडगिरी कायम दिसते आहे. प्रशासनाने ती थांबवावी. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात अवैध व्यवसाय सुरू राहणार नाहीत, याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.
========================