जामखेड – येथील आडत व्यापारी अतिष पवार यांच्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात अतिष पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संथगतीने सुरू असलेल्या व एकेरी वाहतूक असल्याने हा अपघात घडला आहे. आतातरी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदार यांना जाग येणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आतीष भागवत पवार हे बुधवारी रात्री ९ वाजता जामखेडवरून बीड रोडने मोटारसायकलवर चालले होते. बीड रोडने चारचाकी वाहन वेगाने जामखेडकडे येत होते. याच दरम्यान एका हाॅटेलजवळ चारचाकी व मोटारसायकल यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकल वरील आतीष भागवत पवार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जामखेड येथील खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर त्यांच्यावर रात्री ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले.
भागवत पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच जामखेड बाजार समितीमध्ये आज लिलाव बंद ठेवण्यात आले होते. आतीष पवार यांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील तसेच चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.
सध्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने सध्या बीडरोडने एकरी वाहतूक सुरू केली आहे. परिणामी अरुंद रस्ता असल्याने वाहने वेगाने ये- जा करत आहेत. त्यामुळेच हा अपघात घडला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.