परभणी : देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत अन्नधान्याबाबत आयातदार देश होता. कृषि तंत्रज्ञानाच्या जोरावर अन्नधान्यात वाढ करून देशात हरितक्रांती झाली, आज भारत अन्नधान्यात निर्यातदार देश झाला आहे, सर्व कृषि संशोधनातुन शक्य झाले. आज शेजारील देशात अन्नाची कमतरता आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी कृषि पदवीधरांनी योगदान दयावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलपती कोश्यारी हे दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलत होते. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे, उदयपुर (राजस्थान) येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पूढे म्हणाले की, शेती हेच जीवनाचा आधार असुन अन्न हे ब्रम्ह आहे. युवकांनी संत महात्मांपासुन आदर्श घेऊन समर्पित भावनाने आपल्या ज्ञानाचा उपयोग देश व समाज कल्याणासाठी करावा. कृषि विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे भरीव असे योगदान असुन विद्यापीठातील डिजिटल शेतीवर आधारित प्रकल्प अत्यंत चांगला उपक्रम आहे.
यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, आज वसुंधरा दिवस आहे, वसुंधरेचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वावर आहे. शेती पुढे अनेक समस्या असुन कृषि विद्यापीठांनी संशोधनाच्या माध्यमातुन बदलत्या हवामानास अनूकूल तंत्रज्ञान व वाणांची निर्मिती करावी. मागील पन्नास वर्षाच्या कार्यकाळात संशोधनाच्या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे उन्नत वाण, यंत्रे व औजारे विकसित केले असुन अनेक कृषि तंत्रज्ञान शिफारशी दिल्या आहेत, हे सर्व तंत्रज्ञान शेतकरी बांधवाच्या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. कृषिच्या पदवीधरांनी कोणत्याही क्षेत्रातात कार्य करतांना शेती व शेतकरी कल्याणाकरिता कार्य केले पाहिजे. आज कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहेत, या पदवीधारक मुलींनीही शेतकरी महिला सक्षमीकरणाकरिता योगदान दयावे, शालेय स्तरावर कृषि विषयाचा समावेश करण्यात येणार असुन यात कृषि पदवीधर आपले योगदान देऊ शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दुरदृश्य प्रणाली द्वारे विद्यापीठातील नवीन सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहाचे उद्धाटन केले. तर राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादाजी भुसे यांनी विद्यपीठातील बायोमिक्स आणि सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह इमारतीचे उद्धाटन करण्यात आले.