बेलसर -वातावरणात उष्णता जाणवू लागल्याने रसवंती गृह आणि ज्यूस स्टॉलकडे ग्राहकांची पावले वळायला लागली आहेत. मागील दोन वर्षांच्या करोना कालखंडामध्ये रसवंतीगृह यांचे अर्थचक्र बंद पडले होते. रस्त्याच्या कडेला उन्हाळ्यामध्ये दिसत असलेली रसवंती गृह, ज्यूस स्टॉल, कलिंगडाची दुकाने, नीरा विक्री केंद्र त्यासोबतच इतर थंड पेय विक्री करणारे व्यवसायिक दिसतात. चालू वर्षी नुकताच उन्हाळा चालू झाला असल्याने शीत पेय विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
उन्हाळ्यात विविध शीतपेयांची मागणी वाढत असते. त्यामध्ये सर्वांत जास्त पसंती असते ती उसाच्या रसाला. सर्वत्र उपलब्ध आणि कमी किमतीतील हे पेय. प्रामुख्याने उसाचा रस हा आरोग्यालाही फायदा देणार आहे तर उसाचा रस हा बऱ्याच आजाराला दूर ठेवतो असे ही आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उसाचा रस हा चविष्ट व फायदेशीर मानला जातो.हवामानात बदल होत असला तरी उष्णता बऱ्यापैकी वाढल्याने बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.
किंमत कमी आणि फायदे अनेक असा गुणधर्म असल्याने उसाचा रस पिण्यास ग्राहक पसंती देतात. करोना कालखंडामध्ये दोन वर्षे भयानक गेले आहेत; परंतु चालू वर्षामध्ये चांगली आर्थिक उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे.
– विशाल जगताप, रसवंतीगृह चालक, बेलसर