सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभेचा उमेदवार महायुती असो अथवा महाविकास आघाडी यांच्याकडून अद्याप निश्चित झालेला नाही . मात्र लोकशाहीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी महसुल यंत्रणा मात्र सज्ज आहे. सातारा जिल्ह्यात ७ मे रोजी ३,०१९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाला 6,038 बाटल्या शाईच्या प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक एका मतदान केंद्रासाठी दोन बाटल्या शाई दिली जाणार आहे
ही शाई कर्नाटक राज्यातील निवडणूक आयोगाने प्रमाणित केलेल्या मैसूर पेंट अँड वॉर्निश प्रायव्हेट लिमिटेड येथून मागवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये येत्या ७ मे रोजी ३,०१९ मतदान केंद्रांवर पार पाडत आहे. लोकशाहीचा हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे दीड हजार कर्मचारी या प्रक्रियेत गुंतले असून प्रत्येकाला जबाबदाऱ्या ठरवून देण्यात आलेले आहेत. कराड येथील जबाबदारी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण तर सातारा तालुक्याची जबाबदारी प्रांत सुधाकर भोसले यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच त्या त्या तालुक्याच्या प्रांताकडे निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी राहणार आहे.
मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर शाई लावली जाणार आहे. ही शाई विशिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये सिल्वर नायट्रेट मिक्स केले जाते. यामुळे शाईचा रंग घट्ट होऊन ती शाई वाळल्यानंतर सुमारे तीन आठवडे बोटावर तसेच राहते, ती पुसली जाऊ शकत नाही. कधी कधी कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान टक्का वाढवण्यासाठी दुबार मतदानाचा धोका उद्भवला जाऊ शकतो. या प्रकरणाला आळा घालण्यासाठीच निवडणूक यंत्रणेने ही विशिष्ट स्वरूपाची शाई मागवली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये तीन हजार एकोणीस मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्राला दोन बाटल्या याप्रमाणे सहा हजार अडतीस बाटल्या प्रशासनाला प्राप्त झाल्या असून त्यांची सुरक्षितस्थळी रवानगी करण्यात आली आहे. या बाटलीमध्ये 50 ते ते शंभर एमएल शाई असते निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी या बाटल्या मतदान केंद्रांना पुरवल्या जाणार असल्याचे निवडणूक साहित्य अधीक्षक व्ही. के. आघाड यांनी सांगितले.
तीन आठवडे ही शाई बोटावर राहते
या शाईवर विशिष्ट स्वरूपात प्रक्रिया केलेले असते ही शाई बोराला ठसठसणार नाही याकरता याच्यावर विशेष संशोधन करण्यात आले आहे. या शाईच्या सुरक्षिततेची खात्री पटल्यामुळेच 1952 सालापासून मैसूर पेंट्स अँड वार्निश प्रायव्हेट लिमिटेड या एकाच कंपनीकडे या शाईची ऑर्डर दिली जाते.
मतदानाच्या नंतरही तब्बल तीन आठवडे ही शाई बोटावर राहते. त्यामुळे मतदान केलेल्या नागरिक लगेच लक्षात येतो आणि दुबार मतदानाचा बोगस प्रकार थांबवला जाऊ शकतो. याकरिता या शाईला प्राधान्य दिले असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी सांगितले आहे.
निवडणूक कार्यालयाचे कर्मचारी अद्याप सुस्त
पुनर्वसन कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या निवडणूक कक्षामध्ये प्रचंड सामसूम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीनिमित्त रोजची वर्दळ असताना एकांगी कोपऱ्यात असणाऱ्या निवडणूक कार्यालयाचे कर्मचारी अद्याप सुस्त आहेत. महायुती अथवा महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित नाही व येत्या १२ तारखेपासून नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मात्र तरीही निवडणूक कार्यालयातला सन्नाटा आश्चर्य करायला लावणारा आहे.