हवेली तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीची 2021 ला पंचवार्षिक निवडणूक झाली. यावेळी सर्वानुमते सूरज चौधरी यांना सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. सरपंचपद हे केवळ मिरवण्यासाठी नव्हे; तर गावच्या विकासासाठी असते हे सूरज चौधरी यांनी दाखवून दिले आहे. सरपंचपदाच्या काळात चौधरी यांनी केलेल्या विेकासकामांची यादी पाहिली तर नक्कीच आदर्श घेण्यासारखा आहे. मोठे ध्येय ठेवले तर छोट्याशा गावाचा एक सरपंच गावाची काय प्रगती करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सरपंच सूरज चौधरी यांचे नाव घेता येईल.
महिलांना प्रोत्साहन ः सूरज चौधरी यांनी पेठ गावासाठी वेळोवेळी विकास निधी आणून अनेक विकासकामे केली. महिलांसाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरे घेतली. महिलांसाठी स्वतंत्र महिला भवनची उभारणी करून क्लाससाठी जागा उपलब्ध करून दिली. तेथे ब्युटी पार्लर, एम्ब्रॉयडरी असे विविध प्रकारचे क्लासचे आयोजन करून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. महिलांना कपडे धुण्यासाठी धोबी घाटाचे काम पूर्ण केले. पावसाळ्यात पूरस्थिती लक्षात घेता रेल्वेलाइन ते गावापर्यंत संपूर्ण ओढा खोलीकरण करून “पाणी आडवा पाणी जिरवा’चा संकल्प केला. त्यामुळे गावात हरितक्रांती आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी
सरकारी योजनेची माहिती गावात मिळावी त्यासाठी कॅम्पचे आयोजन केले. त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा झाला.
पेठ गावच्या सरपंचपदी निवड होताच गावाच्या विकासासाठी झपाट्याने काम करत असताना करोनाची लाट आली अन् सर्व व्यवहार ठप्प झाले. याला सामोरे जाताना सूरज चौधरी यांनी पेठ गावात जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप केले. जवळजवळ दोन ते अडीच हजार किट गावात ग्रामपंचायत व सहकारी मित्रांच्या माध्यमातून वाटण्यात आले. तसेच पेठ येथे कोविड केंद्र उभारून 47 पेशंटला बरे केले. करोनाच्या काळात ऑक्सिजनची कमतरता सगळीकडेच भासली या पुढील काळात ती भासू नये म्हणून गावात दरवर्षी सूरज चौधरी यांच्यामार्फत भरपूर वृक्षारोपण केले जाते.
त्यामुळे हवेली तालुक्यात वृक्षप्रेमी सरपंच म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक सलोखा जपण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून गणेश मंदिर उभारणीला सुरुवात केली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करून आणण्यात सुरज चौधरी यांचा सिंहाचा वाटा आहे. शिव ओढा ते अल्ट्राटेक कंपनीच्या गेटपर्यंत आमदार अशोक पवार यांच्याकडून रस्ता मंजूर करून आणला. हे सगळं करत असताना सतत समाजाचा विचार करून गावासाठी वेगवेगळ्या योजना आणण्यात सूरज चौधरी यांचा हातखंडा आहे.
एवढ्यावरच न थांबता विकासकामांचा धडाका त्यांनी सुरूच ठेवला. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत एक लाख पाच हजार लिटर पाण्याची टाकी बांधली. तसेच चारवाडा वस्ती येथील विष्णूनगर ते पेठगाव या ठिकाणी वीस वर्षे प्रलंबित असणारा ड्रेनेजलाइनचा प्रश्न कायमचा निकाली काढला. व्हिंटेज सिटी ग्रुपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेत संपूर्ण कंपाऊंड करून घेतले. वाड्या वस्त्यांवर रस्त्याची व ड़्रेनेजलाइनचे कामे केली.
सामाजिक कार्य ः 2021 मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पावसाने थैमान घातले होते. त्यावेळी आलेल्या पुराने अनेक नागरिकांचा संसार उद्ध्वस्त झाला. यावेळी सूरज चौधरी यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने दोन ट्रक भरून धान्य दिले. दरवर्षी त्यांची मुलगी अद्विका हिच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्या वाटप करतात. तसेच जिल्हा परिषदेचे शाळेत पंचायत समितीच्या माध्यमातून मुलांसाठी खेळणी बसविली.
सहकारात योगदान ः 2019 साली श्री दत्त नागरी पतसंस्थेची उभारणी करून गोरगरीब नागरिकांच्या मुलांच्या लग्नाला, शिक्षणाला व तरुणांना व्यवसाय उघडण्यासाठी कर्जाचे वाटप केले. पतसंस्थेने करोना काळात अनेक समाजोपयोगी कामे केली. ही पतसंस्था थोडक्याच कालावधीत तालुक्यात नावारूपाला आलेली आहे.
उल्लेखनीय कार्य
छोट्याशा गावात डिजिटल ग्रामपंचायत बांधून सर्व ग्रामपंचायतीची कामे आधुनिक पद्धतीने सुरू केली.
पोलीस पाटलांना ग्रामपंचायत हद्दीत जागा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणानुसार एक अद्ययावत ऑफिस बांधले व त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
वीस वर्षे प्रलंबित असलेल्या चारवाडा वस्ती येथील विष्णू नगर ते पेठगाव या ठिकाणी ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण केले.
महिलांसाठी स्वतंत्र महिला भवन बांधून तेथे क्लासचे आयोजन करण्यात आले
सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी मुलगी अद्विका हिच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप.
अजितदादांकडून कौतुक ः
गावातील चौकाचौकात ग्रामपंचायत व स्वतःच्या निधीतून बेंच बसविले. डिजिटल ग्रामपंचायतचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजितदादा यांनी एका छोट्या गावात एवढी डिजिटल ग्रामपंचायत बघून सूरज चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.