मुंबई – सिनेक्षेत्रात कास्टिंग काऊचचा मुद्दा बऱ्याचदा समोर आला आहे. अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचा शिकार झाल्याची माहिती दिली आहे. आता नुकतेच मराठीमोळी अभिनेत्री दीप्ती देवीने एका मुलाखतीत कास्टिंग काऊचवर भाष्य केले आहे. ‘नाही म्हणायची ताकद असेल, तर ती वापरायला हवी’ असे मत यावेळी दीप्ती देवीने व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीत दीप्ती देवी म्हणाली की, “कास्टिंग काऊचचा प्रकार सध्या सर्वच ठिकाणी घडत आहे. कोणतेही क्षेत्र त्याला अपवाद ठरलेले नाही. काही माणसं याचा ताकद म्हणून उपयोग करतात किंवा एखाद्या गोष्टीसाठी अट म्हणून वापर करून घेतात. प्रत्येकाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.”
पुढे ती म्हणाली, “हे प्रकार वाढायला लागतात तेव्हा निश्चितच त्याचा त्रास होतो. पण आपल्याकडे कधीही ठामपणे ‘नाही’ म्हणण्याचा पर्याय असतो. सगळ्यांनी ठरवले हे होऊ द्यायचं नाही, तर या पात्रतेवर कुणी कास्टिंग करणार नाही. नाही म्हणायची ताकद असेल, तर ती वापरणे गरजेचे आहे आणि हे सर्वांना वाटले पाहिजे.”
दरम्यान, दीप्ती देवीने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटात उत्तम भूमिका निभावली आहे. तिने ‘कंडिशन्स अप्लायः अटी लागू’, परिवार-कर्तव्य की परीक्षा’, ‘पेज 4’, ‘अंतरपाट’, ‘अपने अपने रिश्तों की बोली’ या चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतेच ‘नाळ’ आणि ‘घर बंदूक बिर्यानी’ या चित्रपटात दिप्ती झळकली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.