पुणे :- महात्मा गांधींच्या बद्दल संभाजी भिडे यांच्याकडून झालेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. संभाजी भिडेंच्या वक्तव्याची आता राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. “संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी”, अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
त्यांनी पत्रात लिहले आहे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य महात्मा फुले तसेच लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल मनोहर भिडे यांनी केलेली वक्तव्य निंदनीय, निषेधार्ह आणि संतापजनक आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपित्याचा अवमान करणे तसेच त्यांच्या मातोश्रींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत जाहीरपणे आक्षेपार्य भाष्य करणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.
वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या मनोहर भिडेंवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी माझ्या विधानाचा विपर्यास केला असं म्हणून भिडे पळवाट शोधतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही हे चुकीचे आहे.
महात्मा गांधींचा देश हीच भारताची जगभरातील ओळख आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा अपमान महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही हे शासनाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे.राज्याचे गृहमंत्री यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.