नवी दिल्ली – आर्यन खान प्रकरणात चुकीची कारवाई केल्याबद्दल केंद्र सरकारने एनसीबीचे तत्कालिन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश अर्थमंत्रालयाला देण्यात आला आहे.
या प्रकरणात समीर वानखेडे यांनी केलेला गलथानपणा उघड झाल्याने वानखेडे यांच्यावर कारवाई होणे गरजेचेच आहे असेही सरकारकडून मान्य करण्यात आले आहे. बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपाखालीही वानखेडे यांच्यावर योग्य ती कारवाई सुरू आहे, असेही सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे.
वानखेडे हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा विषय वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो त्यामुळे त्या मंत्रालयाला आज सरकारच्यावतीने हे आदेश देण्यात आल्याने वानखेडे यांचा पाय अधिक खोलात गेला आहे.
वानखेडे यांनी एनसीबीत काम करताना त्यांची स्वत:ची प्रायव्हेट आर्मी बनवली होती. त्याद्वारे त्यांनी मोठमोठ्या लोकांना विशेषत: चित्रपटसृष्टीतील लोकांना धमकावून किंवा खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी वसुलीचा उद्योग चालवला होता असा आरोप नवाब मलिक यांनी त्यांच्यावर विविध पुराव्यांद्वारे केला होता. आता वानखेडेंची जी चौकशी होईल त्यातून त्यांची ही सारी प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.